देसाईगंज (गडचिरोली) : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या रेती घाटांचा ताबा तहसील प्रशासनाकडे जाणार असल्याने अनेक ठिकाणी अवैध रेती उत्खननाला वेग आल्याची चर्चा आहे. विशेषतः देसाईगंज तालुक्यातील सावंगी रेती घाट परिसरात नियमबाह्य उपशाच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
सावंगी येथे शासकीय वाळू डेपो असूनही नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेती काढली जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक स्तरावर संबंधित विभागांकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
शासनाच्या वाळू धोरणानुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशांनुसार रेती घाटधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तरीही प्रत्यक्षात नियमांचे पालन कितपत होत आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, सावंगी डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असल्याचे दिसत असताना तो संपूर्ण साठा शासनाच्या ‘महाखनिज’ ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदवला गेला आहे का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या मते, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याचे स्पष्टपणे दिसत असून पर्यावरणालाही यामुळे धोका निर्माण होत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे.
अवैध रेती उपसा, नियमांचे उल्लंघन आणि साठवणुकीतील अनियमितता याविरोधात पुढील काळात आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.