![]() |
"मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना"ची अफवा |
मुंबई – राज्य सरकारकडून नागरिकांसाठी वेळोवेळी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये काही योजना शेतकऱ्यांसाठी, काही महिलांसाठी, काही अल्प उत्पन्न गटासाठी, तर काही योजना व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात. मात्र, या योजनांच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार समोर येणे हे नवीन राहिलेले नाही. सध्या सोशल मीडियावर ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ संदर्भात एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमागे कितपत तथ्य आहे, याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (Mukhyamantri Bal Aashirwad Yojana)
नेमका काय आहे मेसेज?
या व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 5वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही पालक किंवा एक पालक 1 मार्च 2020 नंतर मृत्यूमुखी पडले आहेत आणि ज्यांचे वय 18 वर्षांखाली आहे, अशा विद्यार्थ्यांना दरमहा प्रत्येकी 4000 रुपये दिले जातील. ही मदत ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ अंतर्गत दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
![]() |
#FactCheck |
सरकारचा खुलासा काय?
राज्य सरकारने या पोस्टवरील सर्व दावे फेटाळून लावले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' या नावाची कोणतीही योजना महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दिलेली माहिती पूर्णपणे खोटी आहे.
या मेसेजमध्ये इचलकरंजी येथील वेंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिकांची खोटी स्वाक्षरी वापरण्यात आली होती. संबंधित मुख्याध्यापिका यांनीही हा मेसेज बनावट असल्याचे जाहीरपणे स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक किंवा शासकीय योजनांबाबत सोशल मीडियावरून मिळणारी कोणतीही माहिती खात्रीशीर अधिकृत स्रोतामार्फत पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे आहे. अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी सत्य माहितीची खातरजमा करणे नागरिकांचे कर्तव्य आहे.