ब्रम्हपुरी: शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी शहरात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या १८ दिवसांत सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.
माहितीनुसार, ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या भागांतून या मुली बेपत्ता झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यापैकी अनेक मुली क्लाससाठी घराबाहेर पडल्या होत्या; मात्र परत घरी न आल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. काही ठिकाणी त्यांच्या सायकली क्लास किंवा कॉलेज परिसरात आढळून आल्याने संशय अधिक बळावला आहे.
या घटनांमुळे हे प्रकरण साधे बेपत्ता होण्यापेक्षा काहीतरी वेगळे असू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. अज्ञात व्यक्तींनी आमिष दाखवून मुलींना घेऊन गेल्याची शक्यता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. ब्रम्हपुरी हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे शिक्षण केंद्र असल्याने दररोज मोठ्या संख्येने मुली येथे ये-जा करतात. त्यामुळे या घटनांचा परिणाम संपूर्ण परिसरावर जाणवत आहे.
दरम्यान, एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे शहरात एखादी टोळी सक्रिय आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. भरदिवसा गर्दीच्या भागातून मुली बेपत्ता होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांनी सर्व प्रकरणांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
या संदर्भात पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांनी सांगितले की, शहरात कोणतीही टोळी सक्रिय असल्याचे ठोस पुरावे नाहीत. काही मुली वैयक्तिक कारणांमुळे किंवा ओळखीच्या व्यक्तींमुळे घराबाहेर गेल्याचे तपासात समोर येत आहे. यापूर्वीही अशा प्रकरणांमध्ये मुलींना शोधून काढण्यात यश आले आहे.
पालकांनी मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, त्यांच्याशी संवाद वाढवावा आणि अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडू नये, याबाबत त्यांना जागरूक करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
