चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पुन्हा एकदा रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खैरी चक परिसरात धावत्या रेल्वेतून पडून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (९ मे) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित इसम रेल्वेने प्रवास करीत असताना अचानक तोल जाऊन खाली पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे मार्गाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर नागभीड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. त्याने अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, आत पांढऱ्या रंगाची टी-शर्ट तसेच सिमेंट रंगाची फुल पॅन्ट परिधान केली होती.
मात्र, अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील पोलीस ठाण्यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच या व्यक्तीबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास तातडीने नागभीड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांनी प्रवास करताना अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.