महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो महिलांसाठी अखेर दिलासादायक घडामोड समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले अनुदान आता टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असून, अनेक महिलांना सलग दोन हप्त्यांची रक्कम मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे हप्ते विविध तांत्रिक कारणांमुळे थांबले होते. त्यामुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मे महिन्याचा मध्य उलटल्यानंतरही खात्यात पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, काही महिलांच्या खात्यात मंगळवारी १५०० रुपयांची रक्कम जमा झाली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा १५०० रुपये जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाल्याने महिलांना दोन महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये मिळाले आहेत. अनेक लाभार्थींनी सोशल मीडियावर तसेच स्थानिक स्तरावर याबाबत आनंद व्यक्त केला.
शासनाकडून लाभार्थी यादीची पडताळणीही सुरू करण्यात आली होती. नियमांचे उल्लंघन, चुकीची माहिती किंवा अपात्र असूनही लाभ घेत असल्याचे आढळलेल्या काही महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे लाभार्थींच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, योजनेचा लाभ केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच मिळावा यासाठी काटेकोर तपासणी केली जात आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे, बँक खाते आणि इतर माहिती अचूक असलेल्या महिलांच्या खात्यातच हप्त्याची रक्कम जमा केली जात आहे.
दरम्यान, अनेक महिलांनी रखडलेले हप्ते जमा झाल्याने घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा भागविण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. राज्यातील लाखो महिलांसाठी ही योजना मोठा आर्थिक आधार ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.