बल्लारपूर : विसापूर येथे रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आयुष विशाल लाडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता आयुष आंघोळ करून घराबाहेर कपडे वाळत टाकण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. धक्का इतका जोरदार होता की तो जागीच खाली कोसळला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्याला उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
आयुष अत्यंत साध्या परिस्थितीत शिक्षण घेत होता. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर तो आजोबांकडे राहत होता. घरची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याने तो शिक्षणासोबत सुट्टीच्या काळात काम करून कुटुंबाला मदत करत होता.
नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परीक्षेत त्याने ५६.४० टक्के गुण मिळवले होते. पुढे शिक्षण घेऊन आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेने त्याची स्वप्ने अधुरीच राहिली.
शांत, मेहनती आणि नम्र स्वभावामुळे आयुष गावात सर्वांचा लाडका होता. दहावीच्या निकालानंतर घरात आनंदाचे वातावरण असतानाच आलेल्या या दुःखद घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण विसापूर गाव शोकमग्न झाले आहे.



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.