भंडारा जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या दिवशीच घडलेल्या वाघाच्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा वनपरिक्षेत्रातील उमरझरी–बाम्पेवाडा जंगल भागात एका ५० वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (१९ मार्च) दुपारच्या सुमारास समोर आली.
मृत व्यक्तीचे नाव वसंत गणपत मेश्राम (वय ५०, रा. बाम्पेवाडा) असे आहे. सध्या ग्रामीण भागात मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू असून, अनेक जण यावर उदरनिर्वाह करतात. त्याचप्रमाणे मेश्राम हे सकाळच्या वेळी शेताजवळील मोहाच्या झाडांखाली फुले गोळा करण्यासाठी गेले होते.
शेतालगत जंगल क्षेत्र असल्याने तेथे वावर करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सकाळपासून घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळानंतर शेताजवळील जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
