बल्लारपूर : घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २१) समोर आली. शीतल प्रशांत मुळे (वय ३८, रा. सम्राट चौक, बालाजी वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल या सास्ती येथील रहिवासी असून त्यांनी पहिल्या पतीपासून वेगळे होत २०२२ मध्ये बल्लारपूर येथील प्रशांत मुळे यांच्यासोबत विवाह केला होता. काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये मतभेद वाढल्याने त्या सास्ती येथे माहेरी राहत होत्या. शुक्रवारी (दि. २०) रात्री त्या घरातून बाहेर गेल्या, मात्र परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून वर्धा नदी परिसरात तपास केला. शनिवारी (दि. २१) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
