मुंबई : महाराष्ट्रात प्रलंबित ई-चालानच्या दंडाची वसुली करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम सुरू आहे. मात्र या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी वाहनचालकांना रस्त्यात थांबवून तात्काळ दंड भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पोलिसांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर आता प्रलंबित ई-चालानची रक्कम वसूल करताना वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नये, असे स्पष्ट निर्देश अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व पोलीस यंत्रणांना दिले आहेत. या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वाहतूक विभागाने यापूर्वीच ई-चालान वसुलीसाठी एक मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे. त्यानुसार वाहनचालक स्वेच्छेने दंड भरण्यास तयार असल्यासच तो स्वीकारावा. तसेच वाहन जप्तीसारखी कठोर कारवाई केवळ न्यायालयाच्या आदेशानंतरच करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्त्यावर वाहनचालकांना अडवून त्यांच्याशी उद्धटपणे वागू नये किंवा दंड भरण्यास भाग पाडू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. अनेकदा काही कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून नागरिकांना त्रास देत असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.