चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेली लेखी परीक्षा आज सुरू झाली. जिल्ह्यातील २१५ रिक्त पदांसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण २३२१ उमेदवार पात्र ठरले असून, मैदानी चाचणी पार केल्यानंतर आता ते लेखी परीक्षेत आपले नशीब आजमावत आहेत.
या परीक्षेसाठी प्रशासनाने दोन स्वतंत्र परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली आहे. पुरुष उमेदवारांसाठी ‘राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज’ येथे केंद्र निश्चित करण्यात आले असून, येथे १५६८ उमेदवार परीक्षा देत आहेत.
तर महिला उमेदवारांसाठी ‘सरदार पटेल महाविद्यालय’ येथे परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. या केंद्रावर ७५३ महिला उमेदवार लेखी परीक्षा देत आहेत. पहाटेपासूनच उमेदवारांनी परीक्षा केंद्रांवर हजेरी लावण्यास सुरुवात केली होती.
परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. बायोमेट्रिक उपस्थिती नोंद, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखरेख तसेच केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे परीक्षा सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
