चंद्रपूर : देशभर रंगोत्सवाचा जल्लोष सुरू असताना चंद्रपूर–गडचिरोली सीमेवर मात्र दुःखाची छाया दाटली आहे. वैनगंगा नदीत सलग घडलेल्या दोन घटनांमध्ये तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याने सणाच्या दिवशी तीन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. आनंदाचा क्षण काही कुटुंबांसाठी कायमचा वेदनेत बदलला.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव–खरकाडा भागात रविवारी सायंकाळी काही तरुणांनी नदीकाठी मैफिलीचा बेत आखला होता. शुभम बगमारे आणि शुभम सहारे हे मित्रांसोबत वैनगंगेच्या काठी गेले होते. जेवणानंतर आंघोळीसाठी नदीत उतरल्यावर पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने दोघेही खोल डोहात ओढले गेले. सोमवारी दुपारी आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम राबवून त्यांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, ही घटना ताजी असतानाच मंगळवारी होळीच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे आणखी एक दुर्घटना घडली. गायकवाड चौकातील २६ वर्षीय शुभम रामटेके हा रंग खेळल्यानंतर मित्रांसह गांगलवाडी टी-पॉईंटजवळील नदी घाटावर गेला होता. आंघोळ करताना तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला.
क्षणिक निष्काळजीपणामुळे सणाच्या आनंदात दुःखाची किनार उमटली असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.