गोंडपिपरी:- तालुक्यातील तोहगाव येथील वर्धा नदी पात्रात पोहायला गेलेले ३ मुलं वर्धा नदी पात्रात बुडाल्याची (Three children drowned in Wardha river bed ) खळबळजनक घटना आज दि. ८ जुलैला शनिवारी दुपारी दोन वाजता दरम्यान घडली.
तोहगाव वरून दोन किलोमीटर शिंदी जवळ असणाऱ्या वर्धा नदीत १० ते ११ वयोगटातील ४ मित्र पोहायला गेले. त्यापैकी ३ जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. नदी पात्रावर त्यांचे कपडे व पादत्राणे असल्याने हा अंदाज बांधल्या जात आहे.
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तोहोगाव येथील प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे, आरुष प्रकाश चांदेकर ही चार मुले वर्धा नदी पात्रात पोहायला गेलीत. वाहून गेल्यामध्ये प्रतिक नेताजी जुनघरे, निर्दोष ईश्वर रंगारी, सोनल सुरेश रायपुरे ही मुले असल्याची चर्चा असून आरुष प्रकाश चांदेकर हा मुलगा मात्र पाण्यात न उतरल्याने घरी वापस आल्याचे बोलल्या जात आहे.
गावातीलच एका महिलेने ३ मुलांना पाण्यात वाहून जाताना बघितल्याने युद्धस्तरावर शोध मोहीम सुरू असून घटनास्थळी लाठी व कोठारी पोलीस दाखल झाले आहे. अद्याप मुलांचा शोध लागला नाही. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झालेली आहे. त्यामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत आहे.