आरमोरी: महिला पोलीस शिपायाने पुलावरून वैनगंगा नदीत उडी घेऊन केली आत्महत्या | Batmi Express

Gadchiroli Live News,Gadchiroli,Armori Suicide,Gadchiroli Suicide,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,Sindewahi,

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Armori Suicide,Gadchiroli Suicide,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,Sindewahi,

आरमोरी (6/30/23 10:30 PM)वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेणाऱ्या शारदा नामदेव खोब्रागडे या पोलीस शिपाई तरुणीचा मृतदेह पुलापासून काही अंतरावर शोधमोहिमेत रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आढळला. याप्रकरणी मृतक युवतीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार करीत प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे तिने आत्महत्या केली असून यास तिचा प्रियकर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

ती अविवाहित असून सोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याचे तिच्यावर प्रेम होते. परंतू त्या सहकाऱ्याच्या वागणुकीमुळे ती अस्वस्थ झाली होती. त्यातून तिला नैराश्य आले होते. त्यामुळे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीवरील पुलावर तिने दुचाकी आणि मोबाईल ठेवून नदीत उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक, तहसील कार्यालयाचे बचाव पथक आणि स्थानिक ढिवर बांधवांच्या मदतीने शोधमोहिम राबवण्यात आली. दरम्यान, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शारदाचा मृतदेह पुलापासून काही अंतरावर आढळला. शारदाशी संबंधित प्रेम प्रकरणाची आणि त्यातून तिला आलेल्या मानसिक तणावाची माहिती तिच्या कुटुंबियांनाही होती. त्यामुळे त्यांनी शारदाच्या प्रियकराविरूद्ध तक्रार देत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आरमोरी (6/30/23 8:22 PM): शहरापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपायाने नदीत उडी घेतली. ही घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. शारदा नामदेव खोब्रागडे (३० वर्ष) असे सदर शिपायाचे नाव आहे. ती मुळची सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी असून सध्या भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.

शारदा खोब्रागडे यांनी पुलावर आपली दुचाकी उभी केली. तिथेच मोबाईलसुद्धा ठेवला आणि थेट नदीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिकडे धाव घेतली. सोबत आरमोरी तहसील कार्यालयाच्या बचाव पथकाच्या मदतीने वैनगंगा नदीच्या प्रवाहात संध्याकाळपर्यंत शोध घेतला, पण थांगपत्ता लागला नाही. वैनगंगा नदीच्या पुलावर यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

विशेष म्हणजे आतापर्यंत वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी पातळी खालावलेली होती. पण गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गेल्या तीन दिवसात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे शारदा खोब्रागडे नदीच्या प्रवाहात वाहून तर गेल्या नाही ना, अशी भिती व्यक्त केली जात आहे.  त्या अविवाहित होत्या असे समजते. त्यांनी या पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे नेमके कोणते कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.