नागपुर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असते. सध्या विदर्भात सुर्य आग ओकत आहे अशातच नागपुर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसी ( MIDC )मधिल सोनेगाव निपाणी येथे कटारिया अॅग्रो प्रा. लि. या कंपनीत आग लागल्याने 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली तर ह्या आगीत 3-4 कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
आग लागून 5 कामगारांचा मृत्यु झाल्याच्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु: ख व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले आहे. आग नियंत्रणात आली आहे. या घटनेतील जखमींना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपुरचे जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते प्रशासनाशी सातत्यानेसमन्वय साधून आहेत. तहसिलदार हे तातडीने घटनास्थळी पोहचले आहे.