चंद्रपूर: जिल्ह्यातील तांदळाची निर्यात वाढणे गरजेचे – जिल्हाधिकारी गुल्हाने | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर
: चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे तांदळाच्या विविध जाती विकसीत झाल्या आहेत. मात्र तरीसुध्दा निर्यातीमध्ये आपण कमी पडत आहो. चंद्रपूरचा तांदूळ जगाच्या व देशाच्या कानाकोप-यात जाण्यासाठी जिल्ह्यातील तांदळाची निर्यात वाढविणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

उद्योग विभाग, उद्योग संचालनालय आणि लघु उद्योग विकास बँकेच्या वतीने गुंतवणूक, प्रोत्साहन, निर्यात, सुलभ उद्योजकता आणि एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत पिंपळखुटा येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्योग विभाग, नागपूरचे सहसंचालक गजेंद्र भारती, मैत्रीचे प्रकाश अहिरराव, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजीव कळवळे, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेचे व्यवस्थापक रमेश खाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेतला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यात रोजगार निर्मितीकरीता जास्तीत जास्त मध्यम व लघु उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. चंद्रपूर हा तांदळाचा जिल्हा आहे. तांदळाला जी.आय मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. तांदळाची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्याकरीता उद्योग विभाग, इंडस्ट्री असोसिएशन कडून नियमित पाठपुरावा होणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त तांदूळ निर्यात केला जाईल. एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत चंद्रपूरच्या तांदळाची निर्यात वाढविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील.

राज्य शासनाने एक ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी  प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादनाच्या निर्यातीला चालना दिली आहे. मध्यम व लघु उद्योगाच्या माध्यमातून निर्यातीसोबतच रोजगार निर्मितीलासुध्दा हातभार लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजक, निर्यातदार, बँकर्स आदींसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी उद्योग विभागाचे सहसंचालक श्री. भारती म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यातून त्या त्या जिल्ह्याच्या उत्पादनाची निर्यात होणे गरजेचे आहे. एक जिल्हा एक उत्पादनाला राज्य शासनाने प्रोत्साहन दिले आहे. देशातील एकूण निर्यातीपैकी महाराष्ट्रातून 17 ते 18 टक्के निर्यात होते. यात नागपूर विभागातून फक्त 3 टक्केच निर्यात केली जाते. राज्याच्या तुलनेत चंद्रपूरच्या निर्यातीचे प्रमाण केवळ 0.16 टक्के तर नागपूर विभागात चंद्रपूरच्या निर्यातीचे प्रमाण फक्त 6 टक्के आहे. निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी उद्योजकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मधुसूदन रुंगठा, जीवन गड्डमवार आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अंकिता मोरे यांनी केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील उद्योजक, विविध उद्योगाचे प्रतिनिधी आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.