मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचा आज सर्वंच स्तरातून विरोध होताना दिसत आहे. याबाबत आत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संतप्त टिका केली आहे. ज्या महाराष्ट्राचं (Maharashtra) मीठ तुम्ही तीन वर्ष खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमकहरामी केली आहे. जे नवहिंदूवादी आहेत. ज्यांना हिंदुत्वाचे मोड फुटले आहेत. ते कडवे असतील तर त्या मोडधारी सत्ताधारी हिंदूंना ते हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या सरकारने राज्यपालांविषयी भूमिका घेतली पाहिजे. जे पार्सल कुठून तरी पाठवलं आहे. ते पार्सल राज्यपालपदाचा आदर राखत नसेल महाराष्ट्रात राहून जातीपाती आणि धर्मात आग लावण्याचे काम करत असेल, मराठी माणसाचा अपमान करत असेल तर त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात पाठवायचं हा निर्णय सरकारने घ्यावा, समस्त हिंदूंच्या वतीने मी ही मागणी करतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राज्यपाल?
गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी (Mumbai Financial Capital) राहणार नाही असे वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केले आहे. अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, राज्यपाल म्हणून त्या खुर्चीचा मान राज्यपालांनी ठेवला पाहिजे. पण त्या खुर्चीत बसवलेल्या कोश्यारींनी त्या खुर्चीचा मान ठेवला नाही. गेल्या तीन वर्षांतील त्यांची विधाने असतील काही त्यांचे कॅमेऱ्याने टिपलेली दृष्य असतील ते पाहिल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी असे माणसे का येतात हा प्रश्न पडतो. मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊनच्या काळात लोकांचे प्राण जात होते. तेव्हा यांना सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मी तो विषय वाढवला नाही. त्यांनी पत्र दिलं त्यावर मी उत्तर दिलं होतं. मी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा जबाबदारी पार पाडली. मध्ये सावित्रीबाई फुलेंबद्दलही ते वादग्रस्त बोलल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.