गडचिरोली : जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भूकंपाची खोली अंदाजे १० किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे निदर्शनास आले आहे. भूकंपाचे धक्के अहेरी तालुक्यातील अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून मिळाली आहे.
सुदैवाने या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, विविध भागांतून नुकसानीबाबत माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, भूकंपामुळे कुठे काही नुकसान झाले आहे का, याची माहिती संकलित केली जात आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार परिस्थिती नियंत्रणात आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.