वर्धा : शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना अचानक तोल गेल्याने विहिरीत पडून ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळोदी परिसरात गुरुवारी घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत महिलेचे नाव निर्मला वसंतराव कुंमरे (वय ६५, रा. तळोदी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला कुंमरे या आपल्या शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीतून पाणी काढण्याचे काम सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीतील पाण्यात पडल्या.
विहिरीतील पाण्यात पडल्यानंतर त्या बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर संबंधितांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गिरड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीची पाहणी केली.
या प्रकरणी गिरड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमागील परिस्थितीचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, कोणतीही पूर्वकल्पना नसताना घडलेल्या या दुर्घटनेत निर्मला कुंमरे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तळोदी परिसरातील नागरिकांकडूनही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.