नागपूर : खापरखेडा–कोराडी मंदिर मार्गावर भरदिवसा घडलेल्या एका तरुणाच्या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून पती-पत्नीने मिळून तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सागर वानखेडे (रा. येरला पावडे, ता. नरखेड, जि. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यात नोकरी करत होता. होळीच्या सुट्टीसाठी तो आपल्या गावी आला होता. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास घडली.
या प्रकरणात पोलिसांनी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये (रा. वॉर्ड क्र. २, खापरखेडा, ता. सावनेर, जि. नागपूर) या दोघांना अटक केली आहे. हत्येनंतर दोघेही घरी गेले आणि नंतर पोलिस ठाण्याकडे निघाले. मार्गातच पोलिसांच्या नजरेस पडताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळील चाकू जप्त करण्यात आला असून दोघांनीही सागरच्या हत्येची कबुली दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि सागरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद खापरखेडा पोलिसांनी घेतली असून पुढील तपासासाठी प्रकरण कोराडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा आरोपी महिलेचा मामेभाऊ होता. दोघांनी एकत्र शिक्षण घेत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र नंतर तिचा विवाह राजू गजभिये याच्यासोबत झाला. विवाहानंतरही सागर तिच्या संपर्कात असल्याने कुटुंबात तणाव निर्माण झाला होता.
होळीच्या निमित्ताने सागर गावी आला असताना त्याने सोशल मीडियावर संदेश पाठवून तिला भेटण्यास सांगितले. गुरुवारी सकाळी तो खापरखेडा येथे आला. दोघेही मोटारसायकलवरून खापरखेडा–कोराडी मंदिर मार्गाने निघाले. कोलार नदीवरील पुलाजवळ पोहोचल्यावर महिलेने मुद्दाम पर्स खाली टाकल्याचे सांगून सागरला मोटारसायकल थांबवायला लावले. त्या पर्समध्ये आधीच चाकू ठेवण्यात आला होता. मोटारसायकल थांबताच तिने चाकू काढून सागरवर वार केले. त्याच वेळी पती राजू घटनास्थळी पोहोचला आणि त्यानेही चाकूने वार करून सागरची हत्या केली.
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मार्गावरून जाणाऱ्या अनेकांनी हा प्रसंग पाहिला. काहींनी मोबाईलवर व्हिडिओही रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या हातात चाकू असल्याने कोणीही मध्ये पडण्याचे धाडस केले नाही.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार हरीश रूमकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी दाम्पत्य तिथून निघून गेले होते. नंतर दोघांनी पोलिस ठाण्यात येऊन गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू असून प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या तणावाने अखेर एका तरुणाचा जीव घेतल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.