तिरोडा- रोवणीनंतर दुपारच्या सुमारास धुऱ्यांवर बसून जेवण करीत असलेल्या पाच महिलांवर वीज कोसळली. या घटनेत दोन महिलांना जागीच ठार तर चार महिला जखमी झाल्या. सर्व महिला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी गावातील आहेत. ही घटना 2:30 वाजता दरम्यान निलज खुर्द पासून १ किमी अंतरावरील सुर्यप्रकाश बोंदरे यांच्या शेतशिवारात घडली.
तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील १४ महिला रोवणीच्या कामानिमित्त मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द गावात गेल्या होत्या. निलज खुर्द येथील शेतकरी सुर्यप्रकाश बोंदरे यांचे शेतात त्यांनी सकाळपासून रोवणीचे काम केले. दुपारच्या सुमारास धुऱ्यांवर बसून जेवण करीत असतांना अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. काही कळण्याच्या आत वीज कोसळली. यातील लताबाई वाढवे (५०) व वच्छला जाधव (५०) जागीच ठार झाल्या तर गंभीर जखमी महिलांमध्ये सुलोचना सिंगनजुडे (३५), निर्मला खोब्रागडे( ५०), बेबीबाई सयाम (५५) यांचा समावेश आहे. घटनेनंतर एकच धावपळ झाली. ग्रामस्थांच्या सहकार्याने महिलांना बैलबंडीच्या सहाय्याने गावात आणून नंतर करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींवर प्रथमोपचार करून भंडारा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले तर मृतदेह पोस्टमार्टम करिता तुमसर येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.