भंडारा : अज्ञानावर पोसलेल्या अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा पासून समाजातील सर्वसामान्य लोकाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने, आणि समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण करण्याच्या व त्याद्वारे समाजाची घडी विस्कटून टाकण्याच्या दृष्ट हेतूने लोकांना सामान्यत: जादुटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथीत अलौकीक शक्तीच्या किंवा अदभूत शक्तीच्या किंवा भूतपिशाच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने, समाजामध्ये जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्याकरीता तसेच, समाजाचा निकोप व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी, आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदानुषांगिक बाबींसाठी तरतुद करण्याकरीता नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम-2013 शासनाने समंत केला आहे.
कायद्याची जिल्हास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी, प्रचार आणि प्रसार करण्याकरीता जिल्हास्तरीय समिती गठन करण्यात आली असून या समितीची बैठक 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा व्यवसाय तंत्रशिक्षण अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, आदिवासी प्रकल्प अधिकारी व सदस्य राचिव सहायक आयुक्त, समाज कल्याण उपस्थित होते.
जादुटोणा विरोधी कायदा अंतर्गत सन 2013 ते 2022 पर्यंत 64 गुन्ह्यांची नोंद असून त्यात नरवळी अंतर्गत 2 गुन्हे असून त्यांचा तपास करून आरोपींना सजा मुकरर करण्यात आली. सन 2022 ला एकूण 7 गुन्हे, सन 2021 ला एकूण 4, सन 2022 ला एकूण 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जादुटोणा विरोधी कायदा अंतर्गत सर्वात जास्त गुन्हे पवनी तालुक्यात दाखल करण्यात आले आहेत. जादुटोणा विरोधी कायदा अंतर्गत पोलिस विभागाद्वारे जिल्हयात जनजागृती शिबीर, अंधश्रध्दा विरोधी प्रचार-प्रसार, गावातील लोकांकडून जनजागृती, तसेच समाजकार्य महाविद्यालय व समाज कल्याण कार्यालयाद्वारे जनजागृती शिबीरे, अंधश्रध्दा विरोधी प्रचार-प्रसार करण्यात आला आहे.