Mumbai Live: अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कठीण काळात गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलीस दलाचे सक्षमीकरण करणे ही महत्वाची बाब आहे. स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील. तसेच प्रशासकीय कामात माझ्याकडून हस्तक्षेप होणार नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
एकीकडे कोरोनाचे संकट असताना याच महिन्यात गुढी पाडवा आहे, रमजान आहे, महावीर जयंती आहे, आंबेडकर जयंती आहे. प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा असतात. कोरोनाचा अंदाज पहिला तर या महिन्यातील परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे. गृह विभागाकडून महिलांनाही मोठ्या अपेक्षा असतात. त्या देखील पूर्ण करण्याचा पोलीस दलाकडून प्रयत्न केला जाईल, असे दिलीप वळसे पाटल यांनी म्हटले.
मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा जो निर्णय दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. तसेच एनआयए आणि सीबीआय चौकशीला सरकार पूर्ण सहकार्य करेल, असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.